मुंबई, दि.२२ (पीसीबी) : कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपलं जाळं पसरवतोय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या कोरोना बाधित असून सुद्धा त्यांना राज्यातील कोरोना संकटाच सावट भेडसावत आहे. राज्यात करोना विषाणूचा प्रसार वाऱ्याच्या वेगानं होत असताना राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याचा विचार केला जातोय. मात्र, पुन्हा लॉकडाउनच होऊन लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला सुरक्षेचं आवाहन केलं आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
करोना आणि लॉकडाउनचं संकट पुन्हा उभा राहण्याची चिन्ह दिसताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलं आहे. ते म्हणतात कि, “गेल्या वर्षभरापासून आपण करोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु करोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.