आयएएस अधिकारी निधी चौधरीवर कारवाई करा; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
465

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मुंबई महापालिकेतील उपायुक्त व आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह ट्वीट केले होते. यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर आता  चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांबाबत शासन दरबारी असलेल्या व्यक्तीकडून असा प्रमाद घडावा व त्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष करावे ही दुर्देवी, अशोभनीय बाब आहे,  असे पवार यांनी  म्हटले आहे. चौधरींवर कडक कारवाई करावी जेणेकरुन अशा प्रकारची पुनरावृत्ती  होणार नाही. कारवाई न झाल्यास राज्य सरकारची महापुरुषांबाबतची निती खालच्या स्तरावर पोहोचली, असा समज होईल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

१७ मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे,  असे वादग्रस्त ट्विट चौधरी यांनी करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचे छायाचित्र त्यासोबत शेअर केले होते.