आंबेगावात पोहण्यास गेलेल्या दहावीतील तीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू

0
583

आंबेगाव, दि. ३० (पीसीबी) – शिगणेवाडी गावाजवळील मीना नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही  घटना रविवारी घडली. या तिन्ही मुलांचे मृतदेह आज (सोमवार) सकाळी मिळाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रणव राजेंद्र वाव्हळ (वय १६), वैभव चिंतामण वाव्हळ (वय १५), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय १५) अशी  मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.  वैभव, प्रणव आणि श्रेयस तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.  रविवारी सुट्टी असल्याने तिघेही नदीत पोहण्यासाठी गेली होती. मात्र,  तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद वाव्हळ हे रविवारी साडेसहाच्या सुमारास नदीकाठी फिरण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे सायकल आणि कपडे दिसले. यावरून मयत प्रणवचे चुलते महेंद्र यांना गोविंद यांनी फोन करून माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी येऊन तिघांचा नदीमध्ये शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अखेर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले.