मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे, पवार यांनी जनतेसाठी काम केले आहे. परंतु पवार यांची चूक एवढीच होती की, काँग्रेसमध्ये असताना पवारांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला, तर काँग्रेसने त्यांचा अपमान करून त्यांना पक्षातून बाहेर काढले, ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत आज पवार साहेब पुन्हा गेले याची खंत वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे ‘मेरा बुथ, सबसे मजबुत’ या उपक्रमांतर्गंत बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार येथील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून करत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. या संपूर्ण संवादादरम्यान मोदी यांनी पवार यांच्यावर टीका करणे टाळले. यापूर्वी बारामतीच्या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते.