अजित पवार पुन्हा गायब? पुणे दौरा रद्द करण्यामागचे कारण आले समोर

0
252

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात नाराज असून, ते भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. दोन आठड्यांपूर्वीदेखील अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी अजित पवार काही आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

मात्र, आता पुन्हा अजित पवारांनी त्यांचे दुसऱ्यांदा पुण्यातील कार्यक्रम रद्द केल्याने ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची तसेच अजितदादा भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, आता अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम का रद्द केले याबाबत माहिती समोर आली आहे.

काल निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 13 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर मुंबईतील विविध रूग्णालयांममध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, खारघर दुर्घाघटनेनंतर सर्व कार्यकाम रद्द केल्याचे अजित पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर येथील वज्रमूठ सभेनंतर अजित पवारांसह मविआतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी रूग्णालयात जात श्री सेवकांची भेट घेत तब्येतीची चौकशी केली होती. नागपूर येथील सभेतच आपण पनवेल येथे श्री सेवकांच्या भेटीला जाणार असल्याचे तसेच आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचे अजितदादांनी जाहीर केले होते असेही कार्यलयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या अजित पवार हे त्यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यात असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सकाळपासून अजितदादांबाबत ज्या काही चर्चा रंगल्या होत्या त्यावर काहीसा पूर्णविराम लागला आहे. मात्र, ज्या पद्धतीने अजित पवार त्यांचे नियोजित कार्यक्रम अचानक रद्द करत आहेत. ते बघता अजितदादा खरंच भाजपसोबत जाऊन सत्तेत येणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.