मुंबई, दि. ११ (पीसीबी) – गेल्या पाच दिवसापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. तसेच पशुधनाचेही नुकसान झाले . त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी सरकारने अजून एक घोषणा केली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल,अशी माहिती दिली .
‘पुरात वाहून गेलेल्या मोठ्या जनावराच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, तर लहान जनावराच्या मोबदल्यात १६ हजार रुपये तर शेळी – मेंढीसाठी ३ हजार रुपये राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले . पूरग्रस्त भागातील सर्व जनावरांवर मोफत उपचारासोबतच औषधे, लसीकरणही विनामोबदला देण्यात येणार आहे .