जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवा

0
6

खासदार श्रीरंग बारणे यांची हवाई वाहतूक मंत्री, राज्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. २४ – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर राज्यासह देशाच्या विविध भागातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. पर्यटक तातडीने आपल्या राज्यात परतण्याचे प्रयत्न करत असताना अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी याबाबत हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र दिले आहे. पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जण मृत्युमुखी पडले. देशभरातील विविध भागांतील नागरिक जम्मू काश्मीरमधील सुंदरता पाहण्यासाठी गेले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक पर्यटक तातडीने आपल्या राज्यात परतण्याचे प्रयत्न करत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी,चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक अडकले आहेत. या संकटात अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे. हे अतिशय वाईट आणि अमानवीय आहे. तिकीट दर वाढविणाऱ्या विमान कंपन्यांवर आवश्यक कारवाई करावी. जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ करावी. त्यामुळे पर्यटक सुरक्षित आपल्या राज्यात पोहोचतील. या आपत्कालीन परिस्थितीत तिकीट दरात वाढ करू नये असे निर्देश विमान कंपन्यांना द्यावेत. तिकीट आरक्षणात पर्यटकांना प्राधान्य द्यावे. त्यामुळे पीडित परिवार, पर्यटकांना दिलासा मिळेल, असे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.