मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राजकीय पक्ष काढण्यास मराठा समाजाने मान्यता दिलेली नाही, मात्र काही स्वयंघोषित नेते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यास धडा शिकवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यापुढे मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर यायचे असेल तर राजकीय पक्षांचा राजीनामा देऊन यावे लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.
कोल्हापुरात काही लोकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘मराठा क्रांती पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच काही मंडळी येत्या काही काळात आणखी एका मराठा पक्षांची स्थापन करणार आहेत, मात्र, या पक्षांचा ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’शी काहीही संबंध नसणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.