6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी ?

0
181

जळगाव, दि.१५ (पीसीबी) : जळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फिरकी घेताना दिसले. नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ” 6 पर्यंत काम केलं तर हा बाबा उठतो कधी? 6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? काही कळलं पाहिजे ना. पटेल असे बोला ना राव. लयच पुढचं बोलाय लागलेय”

ते म्हणाले “काही दिवसांपूर्वी माझी बहीण म्हणाली होती की मी सकाळी 6 ला उठून काम करतो. आता आहे सवय. वाईट आहे का? त्यावरही मुख्यमंत्री म्हणतात, मी सहाला उठतो. माणूस 24 तास काम करु शकतो का? फार फार तर एक, दोन दिवस तो अशा पद्धतीने काम करु शकतो. किंवा सुरतला गेल्यावर एखादं पद मिळेल म्हणून जागू शकतो. पण नंतर कधीतरी मेंदू म्हणेलच अरे बाबा झोप, झोप. सहा तास तरी झोप पाहिजेच ना.”

आम्ही शरद पवार साहेबांना 55 वर्षांपासून काम करताना पाहतोय. रात्री 2 ला झोपले तरी साहेब सकाळी 7 ला तयार रहायचे. पण मध्ये पाच, सहा तासांची झोप व्हायचीच ना. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आहेच. पण तुम्ही काहीही न पटण्यासारख बोलायला लागला तर आम्हालाही बोलावं लागेलच ना, असेही पवार म्हणाले.

शिंदे – फडणविस सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, ” शिंदे-फडणवीस सरकारमधील एक आमदार गोळीबार करतो, अमरावतीमधील एक खासदार पोलिसांनी हुज्जत घालते, एक जण विरोधकांच्या तंगड्या तोडायची भाषा करते. एवढे होऊनही फडणवीस, शिंदे काहीच बोलत नाही. मविआ सरकारच्या काळात काँग्रेसमधील कुणाच चुकल की सोनिया गांधींचा निरोप यायचा आणि सगळ व्यवस्थित व्हायच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी चुकीच केल तर शरद पवार सूचना करायचे आणि ती चूक दुरुस्त व्हायची. शिवसेनेमधील कुणी चुकीच वागल की उद्धव ठाकरे त्यांना आवरायचे. पण, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कुणी कुणाला सांगायच? हा प्रश्नच आहे. सर्वच्या सर्व 40 बंडखोर म्हणतात आम्हीच मुख्यमंत्री. वर म्हणताय काय, आमचे सरकार सर्वसामान्यांचे. अरे मग आमचे सरकार सामान्यांचे नव्हते काय? आम्ही काय वरुन पडलो होतो का?