भाजप नेत्याची अजित पवारांवर जहरी टीका; “यांनी साखर कारखाने….”

0
145

पंढरपूर, दि.१४ (पीसीबी) : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. पडळकर म्हणालेत कि, ‘अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले. शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आलं आहे. मात्र, त्यांना या पंढरपूर-मंगळवेढाच्या निवडणुकीशी काहीही देणघेणं नाही. त्यांचा डोळा हा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वीच करारपत्र करुन आदिनाथ कारखाना पवारांच्या नातवाने घशात घातला’, अशी घणाघाती टीका त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत बोलताना केली.

गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या संतप्त आणि आक्रमक शैलीत पवार कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला. पडळकर म्हणाले कि,”राज्यातील शेतकरी आणि सभासदांच्या पैशांवर हे साखर कारखाने चालतात. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र मोडून या कारखान्यांमध्ये पैसे भरले आहेत. जवळपास 300 ते 400 कोटींची संपत्ती असणारे हे कारखाने अजित पवार यांनी पाच, सहा, दहा कोटी, अशा कवडीमोल दराने विकत घेतले आहेत.”

एवढंच नाहीतर पुढे ते असंही म्हणाले कि, “मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने महाविकासआघाडी हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. भाजपमध्ये सर्वात जास्त आमदार हे मराठा आणि ओबीसी समाजाचे आहेत. तरीदेखील महाविकासआघाडीचे नेते भाजप जातीयवादी असल्याचे आरोप करतात.”

“भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गरीबाच्या पोराला भाजपने मंत्री केल्याची अनेक उदाहरणे आहेत. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर ही त्याची उदाहरणे आहेत.याउलट महाविकासआघाडी सरकारमध्ये घराणेशाही आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. ही केवळ एका मतदारसंघाची निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याच्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात. पंढपुरातील 35 गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने पैसे दिले नाही तर आम्ही केंद्रातून पैसे आणू,” असे आश्वासनही पुढे गोपीचंद पडळकर यांनी दिले.