नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला दिले आहेत.
झारखंडमधील चायबासा येथील जाहीर सभेत मोदी आज (सोमवार) बोलत होते.
मोदी यांनी राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन’ असा आरोप केला होता. यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदींवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर मोदी यांनी आज चायबासा येथील सभेतून पुन्हा एकदा या मुद्द्यावरून काँग्रेस आव्हान दिले आहे.
मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे बाकी आहेत. यात दिल्ली, पंजाब, भोपाळचेही मतदान बाकी आहे. काँग्रेसला जर इतकेच वाटत असेल, तर आता राजीव गांधी यांच्या प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर रणसंग्राम होऊनच जाऊ द्या. ज्या माजी पंतप्रधानांवर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप आहे. हा मुद्दा घेऊन गांधी घराणे आणि त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या चेल्यांनी निवडणुकीत उतरून दाखवावे, असे थेट आव्हान मोदींनी दिले आहे.