पुणे, दि. १८ (पीसीबी) – देशभरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. या विकासाच्या महामार्गावर कोणालाच अस्पृश्य ठेवता कामा नये. कोणालाच वाहतुकीत वेळ घालवायचा नाही. गावापासून शहरापर्यंत पायाभूत विकास कसा होईल, याकडे आमच्या सरकारचे लक्ष आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) येथे केले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मार्फत करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.