भाजप नेत्याने उपस्थित केली “पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाडीची’ शंका

0
509

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : भाजपने पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार केली जात असल्याची शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी “पुजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने, या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करावी,” अशी मागणी केली आहे.

“ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पुजा चव्हाण या भगिनीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे,” असा आरोप पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना आशिष शेलार यांनी केला आहे.

पुढे शेलार असंही म्हणाले कि, “मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन, हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का?,” असा टोलाही शेलार यांनी मारला.