हवेची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही; ‘मातोश्री’ भेटीनंतर आव्हाडांचे सूचक वक्तव्य

0
1819

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – २०१४ ला समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरु होता, २०१९ ला काही वेगळी समीकरणे जुळतील का? असा प्रश्न आव्हाडांना विचारला असता ‘हवेची दिशा सांगता येते पण राजकारणाची सांगता येणार नाही, मी ज्योतिषी नाही’ असे सूचक वक्तव्य आव्हाडांनी केले.  शिवाय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट वैयक्तिक होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

दोन माणसांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या म्हणून ते भेटू शकत नाही का? असा सवाल आव्हाडांनी केला. राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आव्हाडांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याला प्रत्यूत्तर देताना आव्हाडांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन गेला होतात का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना करण्यात आला. ‘मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांचा निरोप मी काय घेऊन जाणार? माझे वैयक्तिक काम होते, म्हणून मी गेलो होतो’ असे उत्तर आव्हाडांनी दिले. ‘मातोश्री’वर दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. शिवाय सामनातूनही आव्हाडांवर बोचरे वार केले जातात.  मात्र तेच जितेंद्र आव्हाड आज ‘मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

आघाडीत मनसेला सामावून घेण्याचा विचार सुरु असून या भेटीनंतर वेगळे काही पाहायला मिळू शकते? असे आव्हाडांना विचारण्यात आले. ‘फॅसिझम जावा, हा आम्हा सर्वांचा हेतू आहे. सामनामधून वेळोवेळी इशारे दिले जात आहेत, पण गटबंधन किंवा महाआघाडी हे माझ्या अवाक्याबाहेर आहे. पण माझी इच्छा आहे’ असे संकेतही आव्हाडांनी दिले.