“समीर वानखेडे यांची बाजू मजबूत; 18 वर्षाचा झाल्यानंतर आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही”

0
425

मुंबई, दि.२० (पीसीबी) : एखादा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला आहे. त्यामुळे एसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बाजू भक्कम असून या प्रकरणात त्यांच्याच बाजूने निर्णय येईल, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या गदारोळावर भाष्य केलं. 26 फेब्रुवारी 2005 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्यानुसार एका व्यक्तिच्या वडिलांने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यावेळी या व्यक्तीने वडिलांचा धर्म नाकारला. त्याने मदिगा जातीचं सर्टिफिकेट मिळावं अशी मागणी केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यावेळी त्याच्या आजोबा-पणजोबाचा धर्म ग्राह्य धरून त्या व्यक्तिला देण्यात आलेलं मादिगा जातीचं प्रमाणपत्रं ग्राह्य धरण्यात आलं. कुळातून त्याला बाहेर काढलं नाही. कुळानेच त्याला धर्माचा अधिकार दिला आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार घटनेप्रमाणे येणाऱ्या जातीत त्याला अभय देण्यात आलं. तसेच वयाच्या 18व्या वर्षानंतर व्यक्तिला आई-वडिलांचा धर्म लागू होत नसल्याचं या निकालात स्पष्ट करण्यात आलं. समीर वानखेडेंची परिस्थितीही याप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांना आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही, असं आंबेडकर म्हणाले.

वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मी वयात आल्यानंतर वडिलोपार्जित धर्माचाच आहे, असं त्यांनी जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता या निर्णयाने वानखेडे बरोबर आहेत. वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरी वयात आल्यानंतर मी हा धर्म स्वीकारलेला नाही, असं वानखेडेंचं म्हणणं आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार 18 वर्षाचा असेपर्यंत कोणताही मुलगा आई-वडिलांच्या ताब्यात असतो. ते त्याचे पालक असतात. पालक म्हणून आईवडिलांनी जे काही केलं ते त्याला लागू होतं असं नाही. त्याला त्याचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून वानखेडेच्या कास्ट आणि धर्माबाबतचा मुद्दा या निकालात पूर्णपणे कव्हरअप झाला आहे, असं आंबेडकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकला पाहता समीर वानखेडेंच्या कास्ट आणि रिलीजनच्या सर्टिफिकेटवर काही आच येईल असं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नॉर्मली मुलांना आई -वडिलांचा धर्म लागतो. कोर्टाच्या निर्णयानुसार वंशपरंपरा निर्माण होते. मात्र, वयात येणाऱ्या मुलाला कोणती वंशपरंपरा स्वीकारायची हे त्याच्यावर अवलंबून आहे. आजोबा-पणजोबाची संस्कृती, धर्म मान्य केला तर तो ग्राह्य धरला जातो. आईवडिलांनी जो धर्म लिहिला ते ग्राह्य धरावं असं नाही. तो जे स्वीकारतो ते ग्राह्य धरावं असं हा निर्णय सांगतो, असंही त्यांनी सांगितलं.

वानखेडे यांनी पहिलं लग्न मुस्लिम पद्धतीने केलं. पहिल्या पत्नीलाही मुस्लिम पद्धतीने घटस्फोट दिला याकडे आंबेडकरांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, पत्नीच्या धर्माप्रमाणे लग्न झालं हा एक भाग आहे. पण दुसरा भाग म्हणजे त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्टनुसारही लग्न केलं आहे. त्यामुळे त्याचं इंटेन्शन महत्त्वाचं आहे. पत्नीचं नाही. माझ्या आजोबा-पणजोबाच्या धर्माशी मी जुळतोय, आई वडिलांच्या धर्मापासून फारकत घेतोय असा युक्तिवाद त्यांनी केला तर वानखेडेंना काही होईल असं वाटत नाही. वानखेडेंची बाजू भक्कम आहे, असंही त्यांनी सांगितलं.