सातारा, दि. १२ (पीसीबी) – सत्तेच्या स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले पक्ष आहेत, म्हणूनच त्यांच्यापासून सर्वजण दूर जात आहेत. स्वार्थापोटी त्यांची आघाडी झालेली आहे, अशी टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
महायुतीचे उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उदयनराजे बोलत होते.
ते म्हणाले की, आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत त्यामुळे शिवसेना भाजप महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसला शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडला आहे. तसेच महात्मा गांधी यांचा विचार काँग्रेसला जपता आलेला नाही. श्रीनिवास पाटील म्हणतात तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मागणी करतात उमेदवारी मलाच हवी. त्यानंतर मी आरशात पाहणेच सोडून दिले, अशी त्यांची खिल्ली उडवली.
आम्ही विचारांनी एकत्र आलेली माणसे आहोत. त्यामुळे कायमस्वरुपी एकत्र राहू, आमच्या एकत्र येण्यामागे कोणताही स्वार्थ नाही. स्वार्थापोटी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळेच १५ वर्षात ते जनतेचे काहीही भले करु शकलेले नाहीत. त्यांचे विचारही वेगळे आहेत, ते स्वार्थापोटी एकत्र आल्याने त्यांची वाताहात झाली, अशी टीका त्यांनी केली.