सत्ता गेल्याने काँग्रेस सैरभैर झाली आहे – पंतप्रधान मोदी   

0
624

भोपाळ, दि. २५ (पीसीबी) – काँग्रेस पक्ष सत्ता गेल्याने सैरभैर झाला  असून संतुलन बिघडले आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे विकासावर चर्चा करण्याऐवजी हा पक्ष आरोपांची चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) येथे केली.

भोपाळमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली.

काँग्रेस पक्ष छोट्या पक्षांना सोबत घेतो आहे, त्यातही त्यांना फारसे यश येत नाही. मग त्यांनी देशाबाहेर जाऊन कोणी आपल्याशी हातमिळवणी करते, का हे चाचपण्यास सुरूवात केली आहे. आता भारताचा पंतप्रधान कोण असेल हे जगातील देश ठरवणार का?  माझ्या विरोधात या पक्षाने सगळ्या शिव्या-शाप वापरल्या आहेत. तुम्ही कितीही चिखलफेक केली तरीही कमळ फुललेलेच राहिल, असाही विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

इस्लाम स्वीकारलेल्या देशांमध्येही ट्रिपल तलाकला बंदी घालण्यात आली आहे. मग भारतात ही बंदी घातली तर यांची ओरड का? मुस्लिम भगिनींशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काँग्रेसला घेणेदेणे नाही का? असाही प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे.