सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली;शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

0
395

मुंबई,दि.२३(पीसीबी) – ‘केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती. अमृता यांच्या या टीकेला ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’, अशा शब्दांमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिलं आहे.

“इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!” असं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी ‘आजच्या आनंदीबाई’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही…त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते… असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं.