संत निरंकारी मिशनद्वारे पुणे शहरामधील भुकेलेल्यांसाठी मायेचा घास

0
377

 

पुणे, दि.९ (पीसीबी) – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील जनता-वसाहत, गंगाधाम, मार्केटयार्ड, धनकवडी, गोकुळनगर, भोर, खडकी, जय-जवान नगर, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, मोरेवस्ती, बालाजीनगर, दिघी, आळंदी, चऱ्होली, शिक्रापूर, चाकण,खेड,पेरणे-फाटा येथील १५०० हुन अधिक गरजू कुटुंबाना गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, मीठ, मसूर-डाळ या पॅकेटचे वाटप करण्यात आले. जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी तत्पर असतात. गेल्या वर्षी कोल्हापूर येथे अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाच्या वेळी निरंकारी मिशनचे सेवादार सेवेसाठी धाऊन गेले होते.

कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. सर्वसामान्य कुटूंबात महिन्याकाठी येणाऱ्या पगारावर घराचा गाडा चालत असतो त्यामुळे सध्या आवक थांबल्याने या कुटूंबांना मोठी झळ पोहचली आहे.हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा मदत करण्यात आली.

प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात येत असून सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देत स्वयंसेवकांनी स्वतः मास्क,हॅन्डग्लोस चा वापर करून धान्य वाटप केले. हा जीवघेणा आजार आहे या आजारापासून दूर राहायचे असेल तर सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःला, परिवाराला, शहराला या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करण्यासाठी घरातच थांबून सहकार्य करा असा सल्ला यावेळी स्वयंसेवकांद्वारे देण्यात आला.

संत निरंकारी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी संदेश दिला होता की “प्रदूषण आतील असो किंवा बाहेरील दोन्ही हानिकारक आहेत”. २००३ पासून निरंकारी मिशन द्वारे स्वच्छता अभियान,वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संत निरंकारी मिशन च्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे मिशन ला स्वच्छेतेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.