संताप ओळखा अन्यथा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो- उदधव ठाकरे

0
581

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छनास्पद असून सरकारने शेतकऱ्यांचा संताप ओळखावा अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

मराठवाड्यात गेल्या ११ महिन्यांत ८५५ तर विदर्भात ७४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे.

देशभरातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे पाच राज्यांतील निवडणूक निकालांवर चर्चा आणि विश्लेषण करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शेतकरी आत्महत्या हा राजकारणाचा विषय नाही. काँगेसच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ‘या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले ते खूनच आहेत. या सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रंगले आहेत. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचे हे बळी आहेत,’ अशी आक्रमक भाषणे करणारी मंडळीच नंतर सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान झाली, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले.

काबाडकष्ट करून देशाचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे मृत्यू आणखी किती काळ उघड्या डोळ्यांनी बघत राहायचे?, निवडणुकांचे राजकारण चुलीत जाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी युद्धपातळीवर एखादे धोरण का आखले जात नाही?, पोकळ आश्वासने आणि भाषणे करून शेतकऱ्यांना जगवता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.