थकबाकीदार झाले म्हणून विजय ‘मल्ल्याजी’ चोर कसे होऊ शकतात?- नितीन गडकरी

0
795

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय ‘मल्ल्याजी’ चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

‘विजय मल्ल्या ४० वर्ष नियमितपणे व्याज भरत होते. त्यानंतर त्यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि ते अडचणीत आले. व्यवसायात चढ-उतार येतच असतात. त्यामुळे एखाद वेळेस मल्ल्याजी थकबाकीदार झाले, तर त्यांना चोर किंवा फ्रॉड कसे म्हणणार? ही मानसिकताच गैर आहे’ असे गडकरी म्हणाले. मुंबईत आर्थिक संमेलन कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

राज्य सरकारच्या ईकाई सिकॉमकडून मल्ल्याला ४० वर्षांपूर्वी कर्ज देण्यात आले होते. ते कर्ज त्याने वेळेत परत केले होते. एखाद्याला व्यवसायात अडचणी आल्या, तर त्याला पाठिंबा द्यायला हवा, असेही गडकरी म्हणाले. एकीकडे केंद्र सरकारचे मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना गडकरींनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.