शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीशी संबंध नव्हता आणि नसेल – जयंत पाटील

0
315

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता, आणि यापुढेही कधीच नसेल, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्याने तर्कवितर्क लढवले जात होते.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. या पलिकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असं जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

“महात्मा गांधी यांची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे” असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.

शरद पोंक्षे हे प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका करत असत. पोंक्षे कायमच गांधी हत्येचे समर्थन करत आले आहेत.

“ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार? अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर काही दिवसांपूर्वी थेट निशाणा साधला होता.