“शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता”

0
305

कल्याण, दि.२२ (पीसीबी) : शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपला होता, असं विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. त्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले आज कल्याणमध्ये होते. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने ते कल्याणमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. शिवसेना नेते अनंत गिते यांच्या टीकेवरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. 1998मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहे, असे आठवले म्हणाले. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या आरोप प्रत्यारोगाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊत हे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहेत, त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या भानगडी बाहेर काढल्या आहेत. जी अनियमितता झाली त्यासंदर्भात ईडीला तक्रारी केल्या आहेत. आरोपानंतर जे लोक भाजपमध्ये गेले आहेत. इतरांनीही त्यांच्या विरोधात काही असेल तर बाहेर काढावे, असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं.

आठवले यांनी काल शिवसेनेलाही मोठं आवाहन केलं होतं. शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे, असं मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावं आणि अडीच वर्ष फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावं. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं भलं करावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.