जयपूर, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले आहे. या साठ वर्षात ते अपयशी झाले असतानाच विरोधी पक्ष म्हणूनही ते फेल ठरले आहेत. काँग्रेसचे नेते कोणत्याही विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत. कष्ट घेत नाहीत. त्यामुळे त्यांना खोटयाचा आधार घ्यावा लागतो,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) राजस्थानच्या अजमेरमध्ये केली.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेचा समारोप मोदींच्या भाषणाने झाला. यावेळी ते बोलत होते.
जेव्हा विकासाच्या मुद्याची चर्चा सुरु होते तेव्हा काँग्रेसचे नेत पळ काढतात. काँग्रेस नेते फक्त एका कुटुंबाची आरती ओवाळण्यात धन्यता मानतात. जनता ही भाजपाची हायकमांड आहे, तर काँग्रेसचे हायकमांड फक्त एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाभोवीत काँग्रेस नेते प्रदक्षिणा घालतात, असे मोदी म्हणाले.
विरोधी पक्षात बसून काही बोलण्याचे स्वातंत्र्य असते. कारण तेव्हा कोणी विचारणारे नसल्याने प्रवास सोपा असतो, असे मोदी म्हणाले. माझे सरकार सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय उद्देशाने काम करत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. फूट पाडा आणि राज्य करा ही त्यांची मानसिकता असते. याउलट आम्ही संपूर्ण समाजाला जोडण्यासाठी काम करत आहोत, असे मोदी म्हणाले.