“विरोधी पक्षाच ऐकून सगळ्यांचेच राजीनामे घेतले, तर सरकार कसे चालवणार?”

0
324

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक असलेली गाडी आढळली. आणि यामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे असल्याचं समोर आलं. त्यानंतर सचिन वझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावांभोवती राज्यातील राजकारण फिरायला सुरुवात झाली. “उद्धव ठाकरे यांनीच वाझेंना सेवेत घेण्यास सांगितलं होतं,” असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी उत्तर देत फडणवीसना टोला लगावला आहे कि, “ईडी येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येऊद्या. बाप शब्द मी मुद्दाम वापरत नाही. जो तपास करायचा, तो करा. ईडी, सीबीआय, एनआयएची मुख्यालये मुंबईत आणायचे असतील, तर आम्ही त्यांना बीकेसीमध्ये चांगल्या ठिकाणी जागा देऊ. त्यांना दिल्लीत तसंही काही काम नाहीये. एका फौजदाराला घ्यावं की, नाही घ्यावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही. हे निर्णय सिस्टीम घेते. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणतात. त्यांची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. फडणवीस उत्तम वकील आहेत. त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की, वकील न्यायालयात कशी केस मांडतात. वकिलांवर काय आरोप होतात?,”

एव्हढाच नाही तर राऊतांनी असा प्रश्न केला आहे कि, “अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाही. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंह यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणात चौकशी करून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय घेतला पाहिजे, या भूमिकेत चूक काय आहे? केंद्रातील अनेक मंत्र्यांवरही आरोप आहेत. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सगळ्यांचेच राजीनामे घेतले, तर सरकार कसे चालवणार?”