नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) – भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात दोनही संघाने निर्धारित ५० षटकात ३२१ धावा केल्या. सामन्यात कर्णधार विराट कोहली याने नाबाद १५७ धावा केल्या. अंबाती रायडू वगळता कोणत्याही फलंदाजाने त्याला अपेक्षित साथ दिली नाही. पण विराटने आपला खेळ सुरूच ठेवत उत्तम खेळ केला आणि भारताला ३२१ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याच्या या खेळीचे हरभजनने कौतुक केले. कोहली हा सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि समर्थपणे पेलतो, अशा शब्दात त्याने विराटची प्रशंसा केली.
कोहली हा उत्तम खेळाडू आहे. तो खेळपट्टीवर आला की सामन्याचा ताबा घेतो आणि आपल्या खेळणे चाहत्यांना खुश करून टाकतो. त्याच्याकडून ज्या अपेक्षा संघाला आणि चाहत्यांना असतात, त्या साऱ्यांची जबाबदारी तो स्वतःच्या खांदयावर घेतो आणि समर्थपणे पेलतो. अशा खेळाडूला माझा सलाम, असे हरभजन म्हणाला.
मैदानावर खेळताना कोहलीची खेळाप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी असते. त्याचा खेळ अविश्वसनीय असतो. म्हणूनच तो रन-मशीन आहे. त्यामुळे विराट कोहली बनणे हे सोपे नाही. त्यासाठी विशेष गुणवत्ता असावी लागते आणि ती गुणवत्ता कोहलीमध्ये आहे. म्हणूनच कोहली कौतुकास पात्र आहे, असेही तो म्हणाला.