विधान परिषदेच्या ११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
652

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी  १६ जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वपक्षीयांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  

११ जागांपैकी ५ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार देणार आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ११ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

विधानपरिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे. १६  जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलैला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची   अखेरची तारीख आहे. ९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. भाजपकडून महादेव जानकर, विजय (भाई) गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश नारायण पाटील, नीलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर  शिवसेनेने अनिल परब, मनिषा कायंदे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने शरद रणपिसे, डॉ. वजाहत मिर्झा यांनी उमेदवारी दिली आहे.