‘विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस; त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी’

0
225

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केलीय.

मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी आम्ही आज धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा दिलाय. जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर 23 तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशाराही मेटेंनी राज्य सरकारला दिलाय. शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय, असा खोचक टोला मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लगावलाय. शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं, अशी मागणी मेटे यांनी केलीय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी जळगावात केला होता.

राठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 19 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला 24 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार दिला जाणार असल्याचा खोचक टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. चव्हाण यांनी उपसमितीचे अध्यक्ष असूनही मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही मेटे यांनी पुन्हा एकदा केली. 102 व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. तसंच अजित पवार यांच्या अभिनंदनाचाही ठरावं करण्यात आला. त्यांनी सारथी संस्थेबाबत उत्तम काम केल्याचं मेटे म्हणाले होते.