नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ४ टप्प्यामध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा देशभरात ७ टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे, तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.
विद्यमान लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला संपणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा अरोरा यांनी यावेळी केली.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल रोजी १० जागांसाठी, तिसऱ्या टप्यात २३ एप्रिल १४ जागांसाठी तर चौथ्या टप्यात २९ एप्रिल रोजी १७ जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
दरम्यान, २०१४ च्या तुलनेत यंदा ७ कोटी मतदार वाढले आहेत. सतराव्या लोकसभेसाठी देशात एकूण ९० कोटी मतदार असून त्यातील १.५ कोटी मतदार हे १८-१९ वर्षांचे, तर १.६० कोटी मतदार नोकरदार आहेत. यंदा प्रथमच ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमशीनचा वापर केला जाणार आहे.