लॉकडाउन बद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताय ? त्या आधी ही बातमी वाचा

0
238

मुंबई,दि.२३(पीसीबी) – सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

राज्यात करोनाचं संकट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. व्हॉट्सअपसह सोशल मीडियातून लॉकडाउन लागू होणार असल्याच्या आणि लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्याचा जात आहे. लॉकडाउनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर अनेक गैरसमजही पसरत असून, राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.

दरम्यान “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं आहे.