जालना, दि. २१ (पीसीबी) – सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्यापेक्षा एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचे होते दुसऱ्या देशात, मग खरे काय ते तुम्हाला कळले असते, अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे.
भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातील जामखेड येथे सभा झाली. या सभेत मुंडे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देशाच्या सुरक्षेवरुन राजकारण केले जात आहे. या लोकांनी राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेले आहे, असे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, हल्ली कोणीही उठते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोलू लागले आहे. वर्तमानपत्राची हेडलाईन होण्यासाठी काहीही बोलायला लागले आहेत. आमच्या जिल्ह्यातील लोकल नेते मोदींवर टीका करु लागले आहेत. नरेंद्र मोदी या लोकांना ओळखतदेखील नाहीत, तरीदेखील हे लोक मोदींविषयी बोलतात.