जालना, दि. १९ (पीसीबी) – आतापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेनेमुळेच निवडून येत आहेत. दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी शत्रू करून घेतले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझा विजय निश्चित आहे. त्यामुळे राज्यसभेतील भाजपचे सह्योगी खासदार संजय काकडे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येऊ देणार नाही, असे शिवसेना नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.
राज्यात शिवसेनेशी युती झाली नाही,तर रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील, असे भाकीत काकडे यांनी केले होते. यावर खोतकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, काकडे यांनी देशभरातील अभ्यासाअंतीच हे भाकीत केले आहे. आजपर्यंत काकडे यांचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त मतांनी दानवे यांचा जालन्यातून पराभव होईल, असे खोतकर म्हणाले.
जालन्यात भाजप केवळ शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच निवडून येत आहे. मात्र, दानवे ज्यांच्यामुळे निवडून आले, त्या सर्वांनाच त्यांनी शत्रू बनवून घेतले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दानवे निश्चित पराभूत होतील, त्यामुळे खासदार काकडे यांना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, असे खोतकर म्हणाले.