रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला – उद्धव ठाकरे

0
523

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेने चलो अयोध्येचा नारा दिल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपाला टोले लगावले आहेत.

बाबरी पाडल्यावर गेल्या पंचवीस वर्षांत फक्त विश्वासघातच सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला असे अग्रलेखात म्हटले आहे.

अयोध्येतील राममंदिराचा लढा पुन्हा सुरू झाला की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही, पण राममंदिराचे भिजत घोंगडे झटकण्याचे कार्य नक्कीच सुरू झाले आहे. ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.