रत्नागिरी-सिंधुदुर्ग साठी नारायण राणे उमेदवार, शिंदे गटाची माघार

0
44

निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ही जागा संयुक्त शिवसेनेने लढवली होती. शिवसेनेचे विनायक राऊत दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पाच खासदारांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा लढवत आली आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यंदादेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला. मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यातील २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही त्यापैकीच एक जागा आहे. मात्र महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांच्या अनेक पारंपरिक जागा भाजपासाठी सोडल्या आहेत. महायुतीत शिंदे गटाला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागांसाठी शिंदे गट अग्रही होता. मात्र आता शिंदे गटाने या मतदारसंघातूनही माघार घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. आता नाशिकची जागा तरी शिंदे गटाला मिळतेय की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.