रत्नागिरी, दि. २२ (पीसीबी) – रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बांदिवडेकर हे ‘सनातन संस्थे’चे कोकण विश्वस्थ आहेत. तसेच नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्या सुटकेसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात बांदिवडेकर यांचाही समावेश होता. यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते असून ‘अखिल भारतीय भंडारी समाज महासंघा’चे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. लोकसभेला त्यांना काँग्रेसकडून रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. पण ते सनातन संस्थेशी संबंधित असल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे समर्थन केले आहे. बांदिवडेकर यांचा सनातनशी कोणताही संबंध नाही. सनातच्या कोणत्याही कार्यक्रमात बांदिवडेकर यांनी सहभाग घेतलेला नाही. किंवा सनातनच्या विचारांशी त्यांना सहानुभूती नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रसिध्दीपत्रक जाहीर करून बांदिवडेकर यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.