मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला,27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका

0
349

मुंबई, दि. १ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. कारण 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे आजच नव्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाकडे कालच पत्राद्वारे केली होती. विधानपरिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याअगोदर शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीचं पत्र दिलं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र दिले. राजभवनावर येऊन शिवसेना नेत्यांनी हे पत्र राज्यपालांना दिले होते.

विधानपरिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त झालेल्या 9 सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून आणण्यासाठी निवडणुका होणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. मात्र उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी विधीमंडळ सभागृहाचं सभाद आवश्यक आहे, त्यामुळे  राज्य सरकारकडून ही निवडणूक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं आहे.

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.