मीरा बोरवणकर प्रकऱणामागे भाजपचाच हात असावा – रोहित पवार

0
187

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अप्रत्यक्षपणे काकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या मागे भाजपचाच हात असावा, अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केलेली आहे. ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण भाजपचं आहे, तेच यानिमित्ताने अजित दादांबाबत घडतंय, असा दावाही रोहित पवारांनी केला. युवा संघर्ष यात्रेबाबत पिंपरी चिंचवडमध्ये जनजागृती करण्यासाठी रोहित पवार आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला ही रोहित पवारांनी उत्तर दिलं. तर आमदार अपात्रता सुनावणीत आम्हाला न्याय मिळेल असा दावा ही पवारांनी यावेळी केला.

ते म्हणाले की, ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं भाजपचं आधीपासून राजकारण आहे. अजित पवारांसोबत भाजप तेच करत आहेत. अजित पवारांची लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. ही प्रतिमा खराब करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. अचानक बोरवणकरांचा मुद्दा पुढे येणं आणि त्यावर चर्चा होणं सोबतच त्यावर अजिप पवारांना उत्तर द्यावं लागणं, यावरुन अजित पवारांची राजकीय ताकद कमी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे का?, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचं रोहित पवार म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष यासंदर्भात कोणता निर्णय घेतील असं वाटत नाही…
आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या तारखा पुढे ढकलताना पाहायला मिळत आहे. त्यावरदेखील रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्था योग्य वेळ या सुनावणीसाठी देणार आहे आणि त्यावर सुनावणीदेखील होईल त्यासोबतच यावर योग्य मार्ग निघेल असं वाटतं. विधानसभेचे अध्यक्ष यासंदर्भात कोणता निर्णय घेतील, असं आम्हाला वाटत नाही मात्र न्यायव्यवस्था लवकरात लवकर निर्णय घेऊन 16 आमदारांना अपात्र करतील आणि भाजपलादेखील हेच हवं आहे. भाजपमधील आमदार मंत्री होण्याची वाट बघत आहे. त्यामुळे 16 आमदार अपात्र झाल्याशिवाय त्यांनी ही संधी मिळणार नाही. त्यामुळे 16 आमदार अपात्र होतील आणि भाजपच्या आमदाराला संधी मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय द्वेषातून कारवाई…
राज्यभर गुन्हेगारी वाढत असल्याचं घटनांमधून समोर येत आहे. तक्रार दाखल झाली की लगेच कारवाई होते, असं नाही तर अनेक ठिकाणी राजकीय द्वेषातून कारवाई केली जाते. भाजपच्या विचाराच्या नसलेल्यांना न्या मिळत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.