माता न तू वैरीणी: मुलगा होत नाही म्हणून आईने पाच मुलींची हत्या करुन स्वत:ही केली आत्महत्या

0
787

बाडमेर, दि. २७ (पीसीबी) –  मुलगा होत नसल्याच्या नैराश्यातून एका आईने पोटच्या पाच मुलींची पाण्याच्या टाकीत ढकलून खून केला. तसेच स्वत:ही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बाडमेरमधील चौहटन येथे घडली.

वानू देवी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिची मुलगी संतोष (वय १३), ममता (वय ११), नैना (वय ९), हमसा (वय ७) आणि हेमलता (वय ३) यांना पाण्याच्या टाकीत ढकलून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिला.

वानू देवीचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांचे पती शाळेत क्राफ्ट टीचर आहेत. एक मुलगी झाल्यानंतर मुलगा होईल अशी तिला आशा होती. मात्र पाच मुली झाल्या तरी तिला मुलगा न झाल्याने ती तणावात होती. पती कामावर गेल्यानंतर ती मुलींना पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेली आणि पाचही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकलले. त्यानंतर स्वत: पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.