बीड, दि. १९ (पीसीबी) – माझा प्रवास यशःश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत झाला. त्यांचा प्रवास मात्र बारामतीपर्यंत झाला, अशा शब्दांत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला आहे.
पंकजा मुंडे नंदागौळ येथे जाहीर सभेत बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मागील पाच वर्षांत खूप काही घडले. आरोप – प्रत्यारोप, गोपीनाथ गड, भगवान भक्तीगडाची उभारणी झाली, सत्तेच्या माध्यमातून कामे झाली. हे करत असताना संघर्षही आला. माझा प्रवास यशःश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत झाला. त्यांचा प्रवास मात्र बारामतीपर्यंत झाला.
मोदी यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि विरोधक तोंडघशी पडले. मोदी मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे गेले नाहीत म्हणून टीका करणाऱ्यांनी जिवंतपणी मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली. हे अजून लोक विसरले नाहीत. गोपीनाथ मुंडे हे नाव मतदारसंघाच्या कपाळावर लिहिलेले आहे. ते सहजासहजी पुसले जाऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या
स्वतःची आमदारकी आणखी साडे तीन-चार वर्ष सुरक्षित असताना मला संपवण्याचा अट्टाहास कशासाठी?’ विरोधक विकासाच्या मोठ-मोठ्या गप्पा मारत आहेत, पण त्यांचे सरकार सत्तेवर येणारच नाही, मग ते विकास करणारच कसा, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांनी लगावला.