महिलांना घडविणारे एक खंबीर महिला व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्योति पठानिया

0
614

पिंपरी, दि. ८ (रोहित साबळे) – ८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसापुरता साजरा करु नका. आपण वर्षाचे ३६५ दिवस आनंदी कसे राहू यासाठी प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या समाजापासून दुखावलेल्या महिलेला द्याल, तर काय द्याल. घर, पैसा, गाडी जास्तीत जास्त नोकरी पण एखाद्या महिलेने समाजातील शोषित पीडित महिलांना आपले जीवनच दिले असेल तर…पिंपरी-चिंचवडच्या उपनगरात राहणाऱ्या ज्योती पठानिया या मूळच्या मुंबईच्या. लग्न झाल्यानंतर त्या पिंपरी-चिंचवडमध्येच स्थायिक झाल्या. त्यांचे शिक्षण बी. एस्सी (अॅग्री) पण मुळातच त्यांना समाजसेवा करण्याची आवड. विशेषत: शहरातील शोषीत महिला/मुली व त्यांच्या लहान मुलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यापासून त्यांची ओळख निर्माण झाली.

संयुक्तरित्या एकत्रित येऊन या कामाला अजून गती देण्यासाठी १९९४ साली त्यांनी नोंदणीकृत चैतन्य महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच या क्षेत्रातील महिलांसाठी काम करण्यासाठी वाघिणीचे काळीज लागते व वैरीही खुप होतात. परंतु त्यांना न घाबरता अनेक अडचणीतून मार्ग काढत सर्वप्रथम पुण्यातील बुधवार पेठेत लहान मुलांसाठी उत्कर्ष रात्रीचे पाळणाघर कुटुंबसखी समुपदेशन केंद्र व त्यानंतर अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी आश्रय सुरु केले. आश्रय चालवताना त्यांना लक्षात आले कि सर्वांत जास्त पीडित महिला या बाजारु लैंगिक शोषणाला बळी  पडलेल्या महिला असतात.

यामुळे त्यांनी बाजारु लैंगिक शोषणाला बळी  पडलेल्या महिलांच्या मुलांसाठी मंडळाच्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र, पोटभर जेवण देणारे सार्वजनिक संगोपन केंद्र, खेळण्याची, अभ्यासाची व झोपण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून चैतन्य मंडळ स्थापन केले. सुधारण्याची इच्छा बाळगणाऱ्या व अडचणीत अडकलेल्या महिला व मुलींना बाहेर काढून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट या स्वर्गीय.प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना नर्सिंग, हाऊस किपींग, चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा मानस पूर्ण पथावर आहे. एका महिलेस मदत केल्यावर ती १०० अन्य महिलांना मदत करेन हे त्यांचे उद्दिष्ट सिध्द होताना दिसत आहे. काळाची पावले ओळखत या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी महिलांना आधुनिकतेने सक्षम केले आहे.

सध्या मंडळात बाजारु लैंगिक शोषण आणि तस्करी बळी, लैंगिक छळ, कौंटुबिक ताण, मानसिक अस्थिरता, समाजाने वाळीत टाकलेल्या स्त्रिया व मानसिक छळाने पीडीत महिलांची येथे वैद्यकीय काळजी घेतात. तसेच येथे महिलांना मानसिक उपचार, शिक्षण, सामाजिक सुविधा दिल्या जातात. चैतन्य महिला मंडळात सर्व वयोगटातील मुली व महिला आहेत. येथे पीडीत महिलेसोबत तिच्या सात वर्ष वयापर्यंत मुलांना राहण्याची मुभा आहे. आजवर मंडळातून सर्व जाती धर्मातील महिला व मुलींना सक्षम बनवण्यात आले आहे. या सर्व महिला समाजातील विविध क्षेत्रात चांगल्या पध्दतीचे काम करत आहेत व आज जी वेळ त्यांच्यावर आली ती इतर महिलांवर येऊ नये म्हणून अनेक गरजू महिला व मुलींना मदत करत आहेत.

तसेच मंडळाच्या माध्यमातून कौंटुबिक सल्ला केंद्र व एक मोफत कायदेशीर मदत केंद्रही  सुरु करण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया सनदशीर मार्गाने पूर्ण व्हावी यासाठी ज्योती पठानिया यांनी स्वत: कायद्याचे (एलएलबी) शिक्षण देखील घेतले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ, प्रेरणादायी कामासाठी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महिला चेतना पुरस्कार, क्रांतीदुत पुरस्कार, संपदा समाजभुषण पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, सावरकर पुरस्कार व सखी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या त्या पूर्णवेळ महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी चैतन्य मंडळात काम पाहतात.

त्यांच्या या कार्याला सलाम!