महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण; नरेंद्र मोदीं म्हणाले, ‘हि तर देशासाठीही गंभीर चिंतेची बाब’

0
320

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : देशांत सध्या कोरोनाने थैमान घातलेलं असंताण, त्यापैकी काही राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाढती करोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत काळजी व्यक्त करत राज्यांना करोनाशी लढण्याच्या सूचना दिल्यात.

दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे. देशातले ८० टक्के करोनाबाधित हे याच सहा राज्यांमधले आहेत. तसंच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचंही ते म्हणाले.