मतदारांना ‘या’ गोष्टीकडे लक्ष देण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन   

0
575

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला  मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासा, असे आवाहन केले आहे.  मोदी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेला मतदार नोंदणी केली नसेल, तर आजच करा, असे म्हटले आहे. आपले एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी  म्हटले आहे.

या ब्लॉगमध्ये मोदींनी चार गोष्टींना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करणे, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरणा देणे, या गोष्टींवर लक्ष देण्याबाबत उल्लेख केला आहे.

मोदींनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की,  मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. आपले एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. मतदान करत आपण देशाची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण करण्यात आपले योगदान देण्याचे काम करतो. आपण सर्वांनी एक असे वातावरण तयार केले पाहिजे,  जिथे मतदानपत्र मिळणे आणि मतदान करणे गर्वाची गोष्ट मानली जावी.  पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना हा दिवस सेलिब्रेशनचा असेल.