“…मग मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो”; फडणवीसांच्या ‘या’ वक्तव्यावर हसन मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया

0
249

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : ‘राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडणार नाही,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत ‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना बाजूला सारत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

मात्र, या सर्व प्रकरणावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल’, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.