भारताशी युद्ध हे नेहमीच्या पद्धतीने न होता, अणुयुद्धच होणार- पाक मंत्री

0
437

इस्लामाबाद, दि. २२ (पीसीबी)-  आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळत नसल्याचे पाहूनही भारताचा शेजारी देश पाकिस्तान अजूनही भारताविरुद्ध युद्धाचीच भाषा करत आहे. तशी स्पष्ट धमकीच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिलीय. या पुढे भारताशी युद्ध हे नेहमीच्या पद्धतीने न होता, ते अणुयुद्धच असेल अशा शब्दांत रशीद यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना रशीद यांनी ही युद्धाची धमकी दिली आहे. भारताविरुद्ध युद्ध सुरू झाल्यास आता ४-६ दिवस रणगाडे आणि तोफा चालणार नाहीत, आता सरळ सरळ अणुयुद्धच होईल, असे रशीद म्हणाले.

मी १२६ दिवस धरणे आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यावेळी सीमेवरील परिस्थिती अशी नव्हती. सध्या सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती ही पाकिस्तानसाठी धमकीच आहे आणि हे युद्ध भयंकर असू शकते, असे शेख रशीद म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हे युद्ध आता पूर्वी सारखे होणारच नाही. काही निर्बुद्ध लोकांना असे वाटते की आता ४-६ दिवस रणगाडे, तोफा चालतील, विमाने उडतील, हवाई हल्ले होतील किंवा मग नौदल तोफांचा मारा करेल. असे मुळीच होणार नाही. हे अणुयुद्ध असेल. हे पूर्णपणे अणुयुद्धच असेल. त्या वेळी जशी गरज निर्माण होईल, तसा पवित्रा घेतला जाईल.