मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढली तर १७० जागा निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केला.
गोरेगाव येथे भाजपच्या कार्यसमितीची बैठक सुरू आहे. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, लोकसभेत धुव्वा उडाल्यानंतर पुन्हा एकदा आघाडी जोमाने तयारी करून लढेल. मात्र, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी वेगवेगळे लढून दाखवावे, दोघांच्या मिळून २० पेक्षाही जास्त जागा येणार नाहीत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला.