बारामतीचे पाणी दुष्काळी भागाकडे पुन्हा वळवले; भाजप सरकारचा शरद पवारांना दणका

0
489

पंढरपूर, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेत असताना कायद्यात बदल करुन बारामतीकडे वळवलेले दुष्काळी भागाचे नीरा देवधरचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्यात आले आहे. भाजप सरकारच्या या  निर्णयामुळे  पवारांना मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे.  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते यांनी यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

माढ्याचे नूतन खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. आज (बुधवार) झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे.  या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस , पंढरपूर  फलटणला या भागांचा समावेश होतो.

नीरा देवधरचे १९५४ साली वाटप करताना पुणे बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात ४३ टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला ५७ टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. पुढे २००९ मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे जवळपास ११ टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते.