मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेणे, हा युतीचा मोठा विजय आहे. बदललेल्या हवेचा अंदाज आल्याने पवारांनी माघार घेतली असावी, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिली.
पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याची आज घोषणा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली .
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढत आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की, बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. देशाचा मूड काय आहे याचा अंदाज शरद पवार यांना आला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.