पाण्याचे नियोजन करण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश

0
230

– आगामी पालिका निवडणुकीत नागरिकच सत्ताधाऱ्यांना पाणी पाजतील

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण पूर्ण भरले आहे. आतातरी शहरवासीयांना मुबलक आणि दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेतील भ्रष्टाचारात व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत कोणतेच नियोजन केलेले नाही. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधा-याना आगामी महापालिका निवडणुकीत जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे.

सध्या पवना धरनात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची वाढती पातळी पाहता 21 सप्टेंबर रोजी धरणातून पवना नदीपात्रात 5 हजार 550 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १ हजार ३५० क्युसेक विसर्ग वीज र्निमिती संचाद्वारे साेडण्यात आला. नंतर दुपारी २ वाजता सांडव्याद्वारे २ हजार १०० क्युसेक विसर्ग वाढवुन ४ हजार २०० क्युसेक करण्यात आला. असा एकूण ५ हजार ५५० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. नदीकाठावरील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील महापालिकेने केले होते. याचा अर्थ धरणात पुरेसा पाणी साठा आहे. तरीही सध्या शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा नियमित करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी न मिळाल्याने त्यांची अडचण होत आहे. चाकरमान्यांचे, गृहणींचे हाल होत असून ते संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे असल्याचे लांडे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळात पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणी पुरवठा मुबलक व पुरेसा केला जात होता. पवना धरण परिसरात पाण्याचा साठा वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः शहरवासियांची गरज व मागणी पाहून दररोज पाणी पुरवठा करण्याची सूचना करत होते. सध्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या हिताचे काहीही पडलेले नाही, हे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादीने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी करूनही गेंड्याच्या कातडीच्या सत्ताधा-यानी आणि प्रशासनाने याबाबत कसलेही नियोजन केले नाही, असे लांडे यांनी म्हटले आहे.

भामा, आसखेड आंद्रा पाईपलाईनचे केवळ गाजर

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने भामा, आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 27.70 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यासाठी मोठा गाजावाजा केला. मात्र, जमीनी ताब्यात घेणे, शासन स्तरावर परवानगी आदीसह इतर अडीअडचणी सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. केवळ ऑनफिल्डचा दिखावा करण्याऐवजी प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांची तहान भागवावी, अशी सूचना लांडे यांनी केली आहे. मात्र, आता हा प्रकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकाळातच पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेच त्याचा शुभारंभ होईल, असे लांडे यांनी म्हटले आहे