पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज – सुनील राऊत यांचा आरोप

0
350

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली असताना आज ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कंबोज यांचा देखील समावेश असल्याचे सुनील राऊत म्हणाले.

”आज जी ईडीची कारवाई सुरू आहे, ती फक्त विरोधीपक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. किरीट सोमैया आणि मोहित कंबोज सारखी अमराठी माणसं सांगतात की विरोधीपक्षातील नेते भ्रष्ट आहेत. मात्र, स्वत: ते भ्रष्ट आहेत. हिंमत असेल तर भाजपाने पात्राचाळ घोटाळ्यातील नऊ कंत्राटदारांची चौकशी करावी, पण भाजपा अशी मागणी करणार नाही, कारण यात मोहित कंबोज यांच्यादेखील समावेश आहे. मात्र, ते भाजपाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ५० लाखांच्या खोट्या एंट्री दाखवून दबाव टाकून संजय राऊत यांना अटकवण्यात येत आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे. तसेच या सर्व कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.