“पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही… “: फडणवीसांनी दिली तंबी

0
257

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता या हल्ल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी निषेध केला आहे. तसेच, भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तत्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात माध्यमांशी बोलताना केली. तसेच, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाहीत. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी. असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. त्यापूर्वी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही घेतले.

“ज्याप्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत. सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे. सरकारचे घोटाळे बाहेर काढणं आहे. त्यांना लक्ष्य केलं जातय, सरकराने विशेषता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. आमच्या काळात अशाचप्रकारची धमकी ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना आली होती आणि शरद पवार मला बोलले होते. ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा आमच्या विरोधात काय बोलतात याचा विचार न करता. तत्काळ त्यांना मी सुरक्षा दिली होती. सरकारचं हे काम असतं, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिली पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.